पुणे : ‘स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम (जीआयबीएफ) एक चांगले व्यासपीठ आहे. या व्यासपीठाचा उपयोग करून घेऊन आपल्या उद्योगांच्या कक्षा विस्तारत जागतिक व्यापार करण्यावर उद्योजकांनी भर द्यायला हवा,’ असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले.
ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजकांचा ‘बिझनेस एक्सलन्स पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, अफगाणिस्तान काउन्सिल जनरल नदीम शेरीफी, इराकचे काउन्सिल जनरल ए. एम. अलीखानी, इथोपियाचे काउन्सिल जनरल दमेके अम्बुली उपस्थित होते.
शाहू महाराज म्हणाले, ‘इराण, अफगाण यांचे भारताशी जुने व्यापारी संबंध आहेत. अनेक मुस्लिम राजांनी स्वातंत्र्यानंतर हे संबंध आणखी वृद्धिंगत केले. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमच्या माध्यमातून राज्यातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत चांगली संधी आहे. याचा स्थानिक उद्योजकांनी लाभ घ्यावा.’
नदीम शेरीफी म्हणाले, ‘अफगाणिस्तान व भारताचे व्यापार व उद्योगातील योगदान मोठे आहे. फोरमचे जगातील आणि देशातील व्यापारी संघटनेशी सामंजस्य करार आहेत. त्याचा फायदा सर्वच उद्योजक, व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात होतो. अफगाणातील ड्रायफ्रूट भारताकडून आयात केले जातात, तर अफगाणकडून मसाल्यांची आयात होते.’
ए. एम. अलीखानी यांनी भारत सध्या अन्य देशांशी व्यापारविषयक करार करण्यात आघाडीवर आहे. त्यांचा फायदा स्थानिक उद्योजकांना होणार असल्याचे सांगितले. दमेके अम्बुली यांनीही ग्लोबल फोरमचा उद्योगांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
डॉ. जितेंद्र जोशी प्रास्ताविकात म्हणाले, ‘मेक इन इंडिया, स्किल डेव्हलपमेंट अभियानामुळे भारतासह परदेशातील कंपन्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, केमिकल, औषध, इलेक्ट्रॉनिक, अवजड उद्योगांतील, क्षेत्रांना जागतिक पातळीवर नेण्याचा मानस आहे. फोरमचे ३७ देशांमध्ये ५३ हजार सभासद असल्याने जागतिक बाजारपेठेत भागीदारीत व्यवसाय करण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.’